मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने हळूहळू निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये लाॅकडाऊनमधुन शिथीलता देण्यास सुरुवात झाली असताना मुंबईतील नागरिक मात्र पुन्हा बेशिस्त वागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतील नागरिक पुन्हा एकदा विनामास्क फिरत असताना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 6 लाख 86 हजारांचा दंड महापालिकेकडून वसूल करण्यात आला आहे.लाॅकडाऊनमधून थोड्या प्रमाणात सूट मिळाली की लगेच लोकांनी बेजबाबदारपणे वागायला सुरुवात केली आहे. एका दिवसात तब्बल साडेतीन हजार लोकांविरोधात प्रशासनाकडून मास्क न लावल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. एका दिवसात तब्बल सात लाखांच्या जवळपास दंड वसूल झाला असल्याने नागरिक पुन्हा एकदा प्रशासनाला सहकार्य करत नसल्याचं आणि बेजबाबदारपणे वागत असल्याचं दिसून येत आहे.
सरकार व प्रशासनाकडून महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी काही दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्बंध शिथिल करायचे की, आणखी कडक करायचे यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर नागरिक आत्ताच बेजबाबदारपणे वागत असतील, तर महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वाटेवर जाण्याची दाट शक्यता आहे.