मुंबईत मुसळधार, मराठवाड्याचंही विघ्न सरणार!
पुणे : चातकापेक्षाही आतुरतेनं पावसाची वाट बघणाऱ्या मराठवाड्याला येत्या तीन दिवसांत मोठा दिलासा मिळण्याची सुचिन्हं आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यावर येत्या काही तासांत कृपावृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
खरिपाची पिकं जळून गेल्यानं आठवड्याभरात मराठवाड्यातील ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. पावसाच्या ७७ दिवसांपैकी तिथे केवळ २९ दिवसच पाऊस झाला आहे. परभणी, बीड, लातूर, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड आणि औरंगाबादच्या काही भागांमध्ये परिस्थिती अगदीच बिकट आहे. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाच्या काळ्या ढगांऐवजी त्यांना निराशेचे ढगच दिसत आहेत. पण, पुढच्या ७२ तासांत मराठवाड्यावरील दुष्काळाची छाया दूर होऊ शकते.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुढच्या २४ तासांत धुवाधार पाऊस पडेल; तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुढच्या तीन दिवसांत चिंब भिजून जाईल, असं वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.