मुंबईत परतणाऱ्यांसाठी आता १४ दिवसांचा होम क्वारंटाइन; पालिकेचा निर्णय
मुंबई | राज्यात करोना साथीचा संसर्ग वाढत असला तरी मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या मात्र स्थिर आहे. मुंबईतील करोना संसर्ग जरी आटोक्यात आला असला तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता गावाहून मुंबईत परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हजारो चाकरमानी आपल्या मुळ गावी गेले आहेत. तसंच, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक जण मुंबईसोडून गावी परतले होते. मात्र, आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक जण पुन्हा मुंबईत परतत आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेनं हे नवे आदेश जारी केले आहेत. मुंबईत पुन्हा करोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून म्हणून प्रशासनानं हे पाऊल उचललं आहे.
सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मात्र काही प्रमाणात मुभा असणार आहे. मुंबईत आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.