मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल
मुंबई: मुंबईत कोरोनाच्या रुग्णवाढीचा सरासरी वेग एक टक्क्याच्या खाली म्हणजे ०.९७ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार मुंबईतील कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले.
गेल्या काही दिवसांत धारावीसह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये रुग्णवाढीचा सरासरी वेग १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे. तसेच सुरुवातीच्या काळात मुंबईत एका कोरोना रुग्णापासून ९ व्यक्तींना संसर्ग होत होता. मात्र, आता हे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून आता एका रुग्णापासून केवळ ०.९७ टक्के अशी लागण होत आहे. अशाप्रकारे कोरोनावर नियंत्रण मिळवणारी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे, असेही इकबालसिंह चहल यांनी सांगितले.
गेल्या दोन ते तीन दिवसांत मुंबईतील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईने आता पाच लाख कोविड चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक ११६४३ चाचण्या करण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी २७ जुलै २०२० रोजी २४ तासांमध्ये ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यानंतरही मुंबईतील एक्टिव्ह रुग्णांची संख्या १८ हजारापेक्षा कमी आहे.