मुंबईतील सर्व इमारतींमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक
मुंबई | महाईन्यूज |
मुंबईतील सर्व खासगी इमारतींमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यापुढील काळात बंधनकारक करण्यात येणार आहे. इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी देतानाच याचा उल्लेख करण्यात येईल. त्यासाठी इमारत नियमांमध्ये बदल करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एक जाळे तयार करण्यासाठी याचा पोलिसांना उपयोग होईल. राज्य सरकारने आतापर्यंत मुंबईत ५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पुढील काळात आणखी ५६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आता सर्व नवीन इमारतींमध्ये आणि इमारतींच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात येईल. हे सर्व कॅमेरे पोलिसांच्या सुरक्षा नेटवर्कशी जोडले जातील. यामुळे गुन्हेगारांना रोखणे शक्य होईल. विशेषतः महिलांविरोधातील गुन्हे कमी करणे यामुळे शक्य होईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे कमी करण्यासाठी लवकरच राज्यात नवा कायदा आणला जाईल. आंध्र प्रदेशमधील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा नवा कायदा आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येईल. यामध्ये स्वयंसेवी संघटना, महिला आमदार यांच्याशीही या संदर्भात चर्चा करण्यात येईल.