मुंबईतील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत
मुंबई – राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये तूर्तास बंदच राहणार आहेत. कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे.
तसेच मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई-विरार, पनवेल, पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावनगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.