मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार
मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. सध्या जरी लोकल सेवा सुरू असली तरी ती केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे यात सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी नाही आहे.
“मुंबईतील लोकल व्यवस्था ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यानुसार केंद्र सरकार याबाबत विचार करेल. हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही,” असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे. “मुंबईतील डबेवाल्यांचे मुंबईकरांशी गेल्या अनेक वर्षापासून नातं जुळलेलं आहे. सध्याच्या संकटात या डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी यासाठी किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण ४०० पेक्षा जास्त लोकांना या गोष्टीचा उपयोग होईल,” असेही अस्लम शेख म्हणाले.
१५ जूनपासून मुंबईची लोकल पुन्हा सुरु करण्यात आली होती. मात्र यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवाशाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत मुंबईत ३५० लोकल धावत आहेत. यात आवश्यक कर्मचारी, केंद्र, आयटी, जीएसटी, सीमाशुल्क, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाचे कर्मचारी प्रवास करत आहेत.