“मी ३० वर्षांपासून राजकारणात, पण…” कांजूर प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहे. तसेच जागेच्या हस्तांतरणावरही स्थगिती आणली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही विकासकामात अडथळा आणू नये असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे.
अजित पवारांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील सहकारी, अधिकाऱी, कायदा विभाग, अॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील. कायदा आणि नियमाला धरुन जी सकारात्मक भूमिका असेल ती आम्ही घेऊ. एखाद्या न्यायालायने अशा पद्धतीचे आदेश दिल्यानंतर त्यावर अपील करण्याची व्यवस्था आपल्या कायदा, नियम आणि घटनेत आहे. त्याचाही विचार केला जाईल. काम सुरु करण्यासाठी जे करावं लागेल याचा विचार केला जाईल”.
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर त्यांनी आपलं मत मांडलं. “केंद्र किंवा राज्य सरकार असो कोणीही विकासकामात अडथळा आणू नये. मी शरद पवारांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिली आहे. मी पण ३० वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी कधीही विकासकामात राजकारण आणत नाही. आम्ही मदतच करत असतो. पण हा निर्णय खूपच जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्यामुळेच केंद्राने टोकाचं पाऊल उचललं आहे”, असं ते म्हणाले.