मी निवडणूक मैदानात उतरताच बारणेंना घाम फुटलाय – पार्थ पवार
- खांडपे येथील संवाद सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
- पार्थ पवार यांनी विरोधकांवर केली सडकून टीका
कर्जत, (महा-ई-न्यूज़) – मावळ मतदार संघातून माझी उमेदवारी जाहीर होताच, शिवसेनेच्या विद्यमान खासदारासह भाजपच्या भल्याभल्यांना घाम फुटला आहे. यांना माहित आहे. एकदा का पार्थ निवडून आला, की पुन्हा आपल्याला मावळात ‘एन्ट्री’ मिळणार नाही. कारण आमची ओळख ही विकास पुरूष म्हणून आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील डरपोक मंडळी साहेबांवर व्यक्तिगत टिका करत आहते. आरे दम असेल, तर माझ्याशी पंगा घ्या, दाखवितो, अशा शब्दांत महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी विरोधकांना आव्हान दिले.
मावळ लोकसभा मतदार संघातील कर्जत तालुक्यातील खांडपे येथे शुक्रवारी (दि. 12) आयोजित सभेत महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार सुरेश लाड़, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, शेकापचे तालुक़ा चिटणीस प्रशांत पाटील, विकास बडेकर, राजेश लाड़ आदी यावेळी उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की, पवार साहेबांनी ‘एक्सप्रेस वे’चा ‘प्लान’ तयार केला. भाजपच्या कार्यकाळात त्याचे काम सुरू झाले. आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात त्याचे काम पूर्ण झाले. या भागात साहेबांनी ‘एमआयडीसी’ आणली. मोठमोठ्या कंपन्या सुरू झाल्या. हज़ारो लोकांना काम मिळाले. साहेबांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून दिले. साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा शेतक-यांची कर्ज माफी केली. २०१४ च्यानंतर युतीचे सरकार आल्यामुळे या कामांना खीळ बसली. याठिकाणी आमदार सुरेश लाड यांच्यापुढे अडचणी निर्माण केल्या. त्यांना या भागात एकही काम मार्गी लावू दिले नाही. म्हणून, त्यांना आंदोलन करण्याची वेळ आली. असे सुडाचे राजकारण भाजप-शिवसेना सरकारने केले आहे, अशीही टिका पवार यांनी केली.
…यात पवार साहेबांचाच मोठेपणा
मावळ मतदार संघातून माझी उमेदवारी जाहीर होताच अनेकांना पोटशूळ झाला आहे. मावळ मतदार संघातील उरण, कर्जत, खालापूर पट्ट्यात बारामती, पिंपरी-चिंचवड़सारखा विकास झाला, तर आपल्याला मावळ मतदार संघात पुन्हा ‘एन्ट्री’ मिळणार नाही. हे विरोधकांना कळून चुकले आहे. म्हणून त्यांनी साहेबांवर खालच्या पातळीची टिका करण्यास सुरूवात केली आहे. ज्या पवार साहेबांनी देशाच्या कठीण काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे महत्वपूर्ण निर्णय दिले. त्यांची बरोबरी आपण करू शतक नाही. हे त्यांना माहित आहे. म्हणून, देशाच्या विकासाचे निर्णय घेण्याची जबाबदारी विसरून पंतप्रधान मोदी सुध्दा पवार साहेबांवर खालच्या पातळीची टिका करू लागले आहेत. उलट त्यातून पवार साहेबांचाच मोठेपणा सिध्द होत आहे. विकासाचे राजकारण करण्यासाठी एकही मुद्दा नसल्यामुळे पवार साहेबांना विरोधकांनी टार्गेट केले आहे, अशा शब्दांत पार्थ यांनी विरोधकांवर फटकेबाजी केली.