मितालीला टी-२० तून वगळल्याने नेटकऱ्यांचा संताप
भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना गमावला. १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ ३४ धावांत भारताचे शेवटचे ८ गडी बाद झाले. सलामीवीर स्मृती मंधाना आणि जमायमा रॉड्रिग्ज वगळता एकही खेळाडूला २ अंकी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील स्वस्तात बाद झाली. या सामन्यात अनुभवी मिताली राज हिला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या कर्णधाराला नेटकऱ्यांनी याबाबत चांगलेच धारेवर धरले.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला असताना मिताली राज हिला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारताला दुर्दैवाने पराभूत होऊन परतावे लागले होते. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर पोवार यांची फेरनिवडी न करता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण तरीदेखील आजच्या सामन्यात भारतीय संघ मिताली राजशिवाय मैदानात उतरला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हरमनप्रीत वर टीकेची झोड उठवली.
—
—
—
—
—
दरम्यान, १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नवोदित प्रिया पुनिया अवघ्या ४ धावांवर माघारी परतली. यानंतर मराठमोळ्या स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्जने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत भारतीय संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. स्मृती मंधानाने ३४ चेंडूत ५८ धावांची खेळी करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. न्यूझीलंडच्या ली तहाहूने ३ बळी घेत भारतीय संघाच्या डावाला खिंडार पाडलं. तिला लेह कॅसप्रेकने २ बळी घेत चांगली साथ दिली. स्मृती आणि जेमायमा रॉड्रीग्जचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.