मायावतींनी भाजपाबरोबर यावे, रामदास आठवलेंचा सल्ला
मोदी सरकारमधील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना भाजपाबरोबर येण्याचा सल्ला दिला आहे. अंतर्गत विरोधाभासाचा हवाला देत ते म्हणाले की, समाजवादी पक्षाबरोबर बसपाची आघाडी दीर्घ काळापर्यंत राहू शकणार नाही. उत्तर प्रदेशमधील विविध भागातून आलेल्या अहवालानुसार सपा आणि बसपा समर्थक आघाडीमुळे नाराज असल्याचे समजते, असे त्यांनी म्हटले आहे. आठवले यांनी काही दिवसांपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही भाजपात येण्याचे आवाहन केले होते.
आठवले पुढे म्हणाले की, भाजपाच्या पाठिंब्याने मायावती उत्तर प्रदेशच्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. सपाबरोबरील आघाडीचा लोकसभा निवडणुकीत अपेक्षित फायदा होणार नाही, हे बसपाच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. सपाऐवजी मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केली पाहिजे. यावेळी त्यांनी भाजपा आमदार साधना सिंह यांनी मायावती यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्त्व्याचाही समाचार घेतला. नेत्यांनी वैयक्तिक हल्ला करू नये. या वक्तव्यामुळे बसपालाच फायदा होईल, असे ते म्हणाले.
मागील वर्षी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा गोरखपूर, फुलपूर आणि कैरानात पराभव झाला होता. तरीही भाजपा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाली. लोकसभा निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींना मतदान करेन आणि सपा-बसपा आघाडीचा एनडीए पराभव करेल, असे त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.
रिपाइंने भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना उत्तर प्रदेशमध्ये तीन लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. येथे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाने ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी बहुतांश दलितांनी एनडीला पाठिंबा दिला होता. दलिता समाजाचा बसपापेक्षा रिपाइंला पाठिंबा आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १४ टक्के दलितांनी मतदान केले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.