मान्सूनचा प्रवास आता उत्तरेकडे
- हवामान खात्याचा अंदाज : कोकण वगळता सर्वत्र पावसाची विश्रांती
पुणे – उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून सक्रिय झाला असल्याने आगामी काळात राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा जोर आता कमी झाला आहे. कोकण वगळता अन्य ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. घाट माथ्यावर पाऊस काही प्रमाणात पडत आहे; पण त्या ठिकाणीसुद्धा पावसाचा जोर कमीच आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा उत्तरकडे सरकला आहे. त्यामुळे बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश या भागात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतात ही मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती असल्याने त्या ठिकाणीदेखील जोरदार पाऊस पडणार आहे. राज्यात मात्र, पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. कारण, सध्या राज्यात मान्सूनसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण नसल्याने जोर कमी होणार आहे. मात्र, अनेक भागात तुरळक ढग असल्यामुळे किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. या आठवड्यात तरी कुठलीही हवामान बदल निर्माण होणार नसल्याने राज्यात पावसाचा जोर सध्या तरी वाढेल, अशी शक्यता नाही.
विसर्ग थांबला
घाट माथ्यावरील पावसाचा जोर ओसरल्याने अनेक धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. पंधरा दिवसाहून अधिक काळ सुरू असणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. पानशेत, वरसगाव आणि पवना धरणातूनसुद्धा पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. मुळशीमधून सध्या 6 हजार 155 तर, चासकमानमधून 2 हजार 765, भाटघरमधून 6 हजार 154, निरा धरणातून 2 हजार 494 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गेले दहा ते पंधरा दिवसांपासून या सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. हे धरण सध्या 90 टक्के भरले आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच धरणे आता पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी, तो वाढल्यानंतर पुन्हा धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. पावसाळ्याचा अजूनही दीड महिना बाकी आहे.