मादकद्रव्य विरोधी मोहीमेत बांगला देशात शंभरावर लोक ठार
ढाका – बांगला देशातील मादकद्रव्यांच्या चोरट्या व्यापारावर सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईत आत्ता पर्यंत एकूण 105 जण ठार झाले आहेत. बांगला पोलिसांच्या ऍन्टी क्राईम युनिट व रॅपीड ऍक्शनच्या बटालियनने ही संयुक्त कारवाई हाती घेतली असली तरी या कारवाईत मोठ्या प्रमाणात जी जीवित हानी झाली आहे त्याच्या विरोधात तेथील उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि विदेशी राजदूतांनी ओरड सुरू केली आहे. सरकारने हे चक्क हत्यासत्रच अवलंबले आहे अशी टीका त्यांनी केली आहे. यापुर्वी बांगलादेशात अशा प्रकारची कारवाई कोणत्याही समाजकंटकांच्या विरोधात झाली नव्हती.
काल रात्री नऊ जिल्ह्यांमध्ये मादकद्रव्यांच्या संशयास्पद अड्ड्यांमध्ये घुसुन या जवानांनी केलेल्या गोळीबारात एकूण बारा जण ठार झाले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्यांच्या विरोधात सरकार अत्यंत कठोर उपाययोजना करीत असल्याची घोषणा 15 मे रोजी केली होती त्यानंतर लगेचच ही धडाकेबाज मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईवर टिका होऊ लागल्यानंतर केलेल्या खुलाशात या दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की ठार झालेले सगळेच आमच्या कारवाईत ठार झालेले नाहीत तर त्यांच्यातील आपसातल्या चकमकींमुळेही अनेक जण यात ठार झाले आहेत.
दरम्यान विदेशी राजदूतांनी या विषयी ओरड सुरू केल्यानंतर सत्तारूढ अवामी लीगच्या नेत्यांनी या राजदूतांची भेट घेऊन त्यांना या विषयीची नेमकी स्थिती समजाऊन सांगितली.