माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात दुसरे राज्य
मुंबई: माता मृत्यूदर कमी करण्यात राज्य सरकारला मोठे यश आले आहे. हे मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात दुसरे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्विकारला. माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ देशात प्रथम असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 2030 पर्यंत माता मृत्यूदर कमी करुन 70 वर आणण्याचे उद्दिष्ट दिले होते. महाराष्ट्राने 2018मध्येच हे उद्दिष्ट साध्य करत माता मृत्यूदर 68 वरुन 61 वर आणण्यात यश मिळविले आहे. या कामी प्रयत्न केलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनंदन करीत, भविष्यात अधिक यश मिळवून माता मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्र प्रथम
या अभियानांतर्गत असलेल्या संकेतस्थळावर खासगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या संकेतस्थळावर देशभरातील जवळपास पाच हजार डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक 600 डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात. त्यासाठी महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदिप व्यास यांनी स्वीकारला. महाराष्ट्रात हे अभियान केंद्र शासनाने सुरू करण्याच्या पूर्वीपासून लागू केलेले होते. या अंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह निमियाग्रस्त गर्भवती महिलांना आयर्नचे इंजेक्शन दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूतीदरम्यान दिसून आलेला आहे.