मातंग समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मातंग समाजाचा मतदानावर बहिष्कार
- शिवशाहीचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांचा इशारा
- संजय ताकतोडे याच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात अ, ब, क, ड, वर्गीकरण व प्रलंबीत मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार टकला जाईल, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा लहुजी शक्तीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी सरकारला दिला आहे.
दाखले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या मजकुरात म्हटले आहे की, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीडमधील केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी मारून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे. संजय ज्ञानोबा ताकतोडे असे त्या तरुणाचे नाव आहे.
मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आली. परंतु, गेंड्याची कातडी आसलेल्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे हे राज्यसरकार कामकाज करत आसल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यसरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने मातंग समाजाच्या युवकाला आरक्षणासाठी आपले प्राण गमवावे लागले. राज्यसरकारने संजय ताकसांडेच्या कुटूंबाची जबाबदारी स्विकारून आरक्षणासाठी तात्काळ सकारात्मक भुमीका घ्यावी, अन्यथा मातंग समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.