“माझी मैना गावाकडं राहिली म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’, – रामदास आठवलेंचे वादग्रस्त वक्तव्य
- लहू मुद्रा फाउंडेशनकडून रामदास आठवलेंचा जाहीर निषेध
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकशाहीर अण्णा भाऊंच्या गीताचा अपभ्रंश करुन “माझी मैना गावाकडं राहिली म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यावरून आठवले यांनी अण्णा भाऊंचा अपमान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडीत विविध कार्यक्रम सुरु आहेत. रामदास आठवले यांनी आज (शनिवारी)या कार्यक्रमाला भेट दिली. भाषणादरम्यान आठवले यांनी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश केला. “माझी मैना गावाकडं राहिली म्हणून मुंबईकडे दुसरी पाहिली’, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अपमान झाल्याचे आरोप लहू मुद्रा फाउंडेशनने केला आहे. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे सर्व समाजाच्या भावना दुखावल्या असून समाज या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदडे, महेश खिलारे, राजेश आरसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली