महिलांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे
- केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची अपेक्षा
नवी दिल्ली – देशात महिलांविरोधातले गुन्हे रोखण्यासाठी जनभावनेचा आदर करत, केंद्र सरकारने कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र, शिक्षेच्या तरतूदीबरोबरच अशा प्रकरणांमध्ये वेळीच न्याय मिळणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.
पोलिस संशोधन आणि विकास पथकातर्फे आज नवी दिल्लीत या संदर्भात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कठोर कायद्यांमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार असले, तरीही गुन्हेगारांना वचक बसवण्याच्या दृष्टीने प्रकरणांचा लवकरात लवकर निकाल लागणे आवश्यक असल्याचे अहिर यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षेप्रति केंद्र सरकार संवेदनशील असल्याचे सांगत, अल्पवयीन बालकांच्या संदर्भातल्या अशा प्रकारातल्या गुन्हेगारांसाठी सरकारने अधिक कठोर शिक्षेची तरतूद केल्याचा पुनरुच्चार अहिर यांनी केला. अशा खटल्यांच्या तपासासाठी सरकारने कालमर्यादा निश्चित केली असून, ते लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयात चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.