breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महिलांना आखाती देशात वेश्याव्यवसायात ढकलणारे त्रिकुट अटकेत

आखाती देशात नोकरीचे अमिष दाखवून महिलांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या त्रिकुटाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. या तिघांच्या जाळ्यात जवळपास ५० ते ६० महिला अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेहरीमध्ये अडकलेल्या एका राजस्थानमधील महिलेच्या धाडसामुळे मोठं रॅकेट उघडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गरीब आणि गरजू महिलांना दुबई, बेहरीनसारख्या आखाती देशात हॉटेलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून हे तिघेजण त्यांना वेश्याव्यवसाया करण्यास भाग पाडत होते. पोलिसांनी अटक केलेले तिघे एजंट आहेत. तर मुख्य आरोपी आखाती देशात लपून बसला असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे.

मुंबई खंडणी विरोधी पथकाला सुत्राने दिलेल्या माहितीच्या आधारावर रॅकेट उघडकीस आले. मुबईतील गरजू महिलांना हेरून आखाती देशात नौकरीसाठी पाठविणाऱ्या आरोपी मोहम्मद कमाल अन्वर शेख (५६), टिंकू दिनेश राज(36) आणि फरीद उल हक शहा उर्फ टिपू यांना अटक केली. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान या तिघांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी गरजू महिलांना हेरून बेहरीन, दुबई तसेच अन्य आखाती देशात पाठवायचे. त्यानंतर मुख्य आरोपी महिला हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर पासपोर्ट काढून घेत असे. महिनाभरानंतर ५० हजार पगार दिला जायचा. त्यानंतर महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास अन्य ठिकाणी पाठवले जायचे. आखाती देशात अडकलेल्या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जायचे. ज्या महिला वेश्याव्यवसाय करत नव्हत्या त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात येत होते. नोकरीच्या आमिषासा बळी पडलेल्या बहुतांश महिला ह्या पूर्वाश्रमीच्या बारबाला किंवा बांगलादेशी, राज्यस्थानी आणि नेपाळी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुटकेसाठी दोन लाख मोजून भारतात परतलेल्या राजस्थानमधील पीडित महिलेच्या धाडसाने अडकलेल्या मजबूर महिलांच्या व्यथा मुंबई पोलिसांना समजल्या. पीडित महिलेने वेश्याव्यवसाय करण्यासाठी विरोध केला असता तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. पीडितेने संधी मिळताच आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला, कुटुंबीयांनी दलालाशी संपर्क साधल्यानंतर मुंबईत दोन लाखाची रक्कम दिल्यानंतर तिची सुटका करण्यात आली, अशी माहिती खंडणी विरोधी पथकास महिलेनी दिली.

मुंबई खंडणी विरोधी पथक आखाती देशातील भारतीय दूतावासाशी संपर्कात आहेत. या दलालांच्या विळख्यात अडकलेल्या महिलांच्या सुटकेसाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. एका महिलेच्या धाडसाने मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाचे रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बेहरीनमध्ये हॉटेल व्यवसाय चालविणाऱ्या मुख्य आरोपीच्या पोलीस शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button