महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबत
हरयाणा आणि झारखंडमधील आव्हानांमुळे भाजपमध्ये काथ्याकुट
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह तीन राज्यांतील विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबत होण्याची शक्यता बळावली असल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली आहे.
भाजपातील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये भाजपची स्थिती थोडी कमकूवत आहे. या राज्यांमध्ये सत्ताप्राप्तीचे लक्ष्य गाठताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागेल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होवून तीन राज्यांची सत्ता कायम राखण्याचा विचार सुरू आहे.
महाराष्ट्रासह हरयाणा आणि झारखंड विधानसभेची मागील निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीनंतर झाली होती.
अशात लोकसभेसोबत तिन्ही राज्यांमध्ये मुदतीपूर्व निवडणूक घेणे जास्त सोयीचे राहिल, असे पक्षाला वाटू लागले आहे. मागच्यावेळेस मोदी मॅजीकमुळे तिन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ताप्राप्ती झाली होती. मात्र, आता तिन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस आणि राजद आघाडीचा सामना भाजपला करावा लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हरयाणामध्येही वातावरण भाजपाभिमूख दिसून येत नाही. यामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता आहे.