महाराष्ट्रात 23 जानेवारीपासून शेतकरी आंदोलन
मुंबई – मागील जवळपास 2 महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेची 9वी फेरी सुद्धा निष्फळ ठरली असून, तोडगा निघणार कधी ? असा सवाल आता केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून देखील शेतकऱ्यांच्य या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे.
वाचा :-काँग्रेस आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
23 जानेवारीला, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आंदोलन पुकारण्यात आले आहे.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार मुंबईत चार दिवस ठिय्या आंदोलन करणार आहे. येत्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी असे चार दिवस हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
विविध संघटना 23 जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. 24 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्व जण एकत्र येतील व 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता राज भवनाच्या दिशेने कूच करतील. 26 जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल.