महाराष्ट्राचा आजवरचा सर्वात यशस्वी अर्थसंकल्प, अर्थमंत्री अजित पवार यांचे ‘अभिनंदन’
- पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासात भर घालणारा अर्थसंकल्प
- राष्ट्रवादी कार्यकर्ते संदीप काटे यांनी अजित पवार यांचे केले कौतुक
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 6) सभागृहात सादर केला. राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण ही आव्हाणे पेलत अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या विचारधारेला न्याय देऊन सर्वसमावेशक योजनांचा समावेश करण्यात अर्थमंत्री अजित पवार यांना यश आले. त्यामुळे राज्याच्या विकासात राष्ट्रवादीचे योगदान कसे महत्वाचे आहे, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहारचातुर्य व कर्तबगारीने दाखवून दिले. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी अजित पवार अल्पावधीतच लक्ष घालतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे महसूली तुटीच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करुन विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प सामान्य माणसाला अपेक्षित असा आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राज्याला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्राच्या निधीची वाट न बघता राज्यातील शेतकऱ्यांसाठी घवघवीत योजनांसोबत, भूमिपुत्रांना नोकऱ्यांत आरक्षण, मुद्रांक शुल्कात १ टक्क्यांची कपात ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील, असे परखड मत काटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मांडले आहे.
मंदावलेल्या गृहबांधणी क्षेत्रातील पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या वर्षासाठी मुद्रांक शुल्कामध्ये १ टक्के सवलत देण्यात आली आहे. औदयोगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विकासासाठीही अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पुणे शहरात वाहतूक कोडीं सोडविण्यासाठी पुणे शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यात येणार आहे. चार वर्षात हा रिंग रोड तयार होणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. मागच्या सरकारच्या काळात देण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आगामी वर्षात देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे. स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे.
पुणे शहरात आणखी एका विमानतळाची भर पडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असलेल्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून, पायाभूत सुविधांना भरीव मदत केली आहे. कुठलेही सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारने मांडलेला पहिला अर्थसंकल्प हा राज्याच्या पुढील पाच वर्षाची वाटचाल अधोरेखित करत असतो. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्थमंत्री पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याला पुन्हा एकदा उभारी देईल, असेही काटे यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी शहरात तातडीने बैठक घ्यावी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड पाण्याचा प्रश्न, मिळकतकर वाढ, शास्तीकर, महापालिकेचा येस बँकेतील अडकलेला निधी, सत्ताधाऱ्यांची सभागृहात चालणारी मग्रुरी यासारखे आणखी काही प्रश्न निकली काढण्यासाठी लवकरच शहरात बैठक घ्यावी व आपल्या कर्तबगारीने हे सर्व प्रश्न निकाली काढावेत, अशी अपेक्षा आहे. तूर्तास तरी पवार यांनी महाराष्ट्राचा यशस्वी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत, असे या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे.