महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयाची ‘तीन परिमंडलात’ होणार विभागणी
- प्रशासन विभागाकडून प्रस्ताव तयार
- विधी समिती आणि महासभेची घेणार मान्यता
विकास शिंदे
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन करण्यात येणार आहेत. प्रशासनाचा गतीमान व पारदर्शक कारभार करण्यासाठी ही विभागणी करुन उपायुक्तांच्या माध्यमातून कारभार हाकण्यात येणार आहे. याबाबत प्रशासन विभागाकडून प्रस्ताव तयार केला केला असून विधी समितीसह महासभेपुढे ठेवून मान्यता घेण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
महापालिकेच्या प्रशासन विभागाने प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणि सुसूत्रतता आणण्यासाठी हे परिमंडल तयार करण्यात येत आहे. महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयांची विभागणी प्रत्येकी तीन-तीन क्षेत्रीय कार्यालयाचे दोन परिमंडल आणि दोन क्षेत्रीय कार्यालयाचे एक परिमंडल यानूसार भौगोलिक रचनेनूसार विभागणी केली जात आहे. या तीन परिमंडलाची जबाबदारी उपायुक्तांना देवून आर्थिक व प्रशासकीय पातळीवर अधिकार प्रदान केले जाणार आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या प्रत्येक विभागाची विभागणी करुन ते अधिकार उपायुक्तांना दिले जाणार आहे. त्यामुळे परिमंडल स्तरावरच त्या-त्या प्रभागातील अडीअडचणी, समस्या सोडवून नागरिकांना सुलक्ष सेवा-सुविधा दिल्या जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या प्रशासन विभागाने आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनानूसार प्रशासन विभागाकडून चर्चा-विनिमय करुन अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तसेच प्रशासन विभागाकडून सदरील प्रस्ताव विधी समिती आणि महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवून लवकरच मान्यता घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना महापालिकेच्या सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी मुख्यालयात येण्याची आवश्यकता लागणार नाही, असेही वरिष्ठ अधिका-याकंडून सांगण्यात आले.
दहा कलमी कार्यक्रमांची होणार आखणी
प्रशासकीय कामकाजात गतीमानता येण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये कार्यालयीन तपासणी, स्पर्धा, माहिती प्रसार, भविष्यातील विकासाचा नियोजन आराखडा, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध करणे, क्षमता बांधणी, धोरणे, ई-ऑफीस कामकाजाबाबतची तयारी, कार्यालयीन सुधारणा, दक्षता व नियंत्रण कक्ष यांचा समावेश होता. मात्र, परदेशीच्या बदलीनंतर हे दहा कलमी कार्यक्रम योग्य पध्दतीने राबविण्यात आले नाहीत. मात्र, हे दहा कलमी कार्यक्रम प्रशासनाकडून योग्य आखणी करुन पुन्हा नव्याने राबविण्यासाठी तयारी सुरु आहे.