मसूद अजहरला कोणी सोडलं, मोदींनी शहिदांच्या कुटुंबियांना सांगावं : राहुल गांधी
पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूमध्ये जैश-ए-महंम्मदचा हात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यावरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरची १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून सुटका कोणी केली होती, हे मोदींनी पुलवामातील त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांगावं, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी १९९९ मध्ये मसूदच्या सुटकेवेळचे अजित डोभाल यांचे काही फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये डोभाल यांना त्यांनी वाटाघाटी करणाऱी व्यक्ती असे संबोधले आहे. तसेच पुलवामातील जवानांचा मारेकरी मसूद अजहरची भारताच्या कैदेतून सुटका करणारे कोण होते. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच याचे ‘डील मेकर’ आहेत. हे ही मोदींनी जवानांच्या कुटुंबियांना सांगावे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काल कर्नाटकात निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधीं म्हणाले की, देशातील सर्वांत जुना पक्ष असलेली काँग्रेस कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही. यावेळी त्यांनी १९९९मध्ये मसूद अजहरच्या सुटकेवरुन भाजपावर निशाणा साधला होता.
१९९९ मध्ये मसूद अजहरसह काही दहशतवाद्यांची भारताने सुटका केली होती. त्यावेळी वाजपेयींचे सरकार होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी इंडिअन एअरलाइन्सचे विमान १५० प्रवाशांसह हायजॅक करुन अफगाणिस्तानातील कंदाहर येथे नेले होते.