मराठा समाजाच्या या आहेत मागण्या…. म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक
पुणे ( महा ई न्यूज ) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यात शांतता, अहिंसेच्या मार्गानं हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं महाराष्ट्र बंद करण्यात आला. दरम्यान, मराठा समाजाच्या सरकारकडे या आहेत मागण्या… ते आपणही बघा…
मराठा समाजाच्या या आहेत मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्या, 10 ऑगस्टपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करा, आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्या, मराठा समाजास कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळणे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, मराठा समूहाच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI) स्वायत संस्था त्वरित सुरु करण्यात यावी, छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरित सुरु करणे. छत्रपती शिवरायांच्या गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू मिल कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात, प्रत्येक जिल्हात मराठा भवनसाठी शासकीय जमीन देण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या ५०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करावी. त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी,प्रकल्पग्रस्त,धरणग्रस्त यांच्या वारस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारे वसतिगृह बांधण्यासाठी जिल्हापरिषद व स्थानिक महापालिकांना निर्देश देण्यात यावेत, रुपये ६ लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती मिळणेबाबत. मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार ईबीसी योजनेची आर्थिक मर्यादा १ लाख वरून ६ लाख केली आहे. या योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी त्यातील काही अटीमध्ये दुरुस्त्या करणे, योजनेचा विस्तार करणे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळविणे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या समस्या, अधिवास प्रमाणपत्र यासारखे प्रश्न सोडविणे. मात्र एवढ्याने मराठा समाजाचे प्रश्न सुटू शकत नाही. एस.सी एस.टी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी सवलती मिळाव्यात.