मराठा समाजाच्या नाराजीमुळे पदवीधर निवडणुकीत पराभव, ‘या’ भाजप नेत्याची कबुली
विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली आणि विजयी झाले. मात्र आता या मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसल्याची कबुली खुद्ध भाजप नेत्याने दिली आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना आणि औरंगाबादमधील कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने निर्णय घेतला असला तरीही भाजपला पाठिंबा वाढण्यासाठी उपयोग झाला नाही. उलट आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशीच भावना मराठा समाजात आहे. त्याचा काहीसा फटका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बसला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भाजप हा मराठा केंद्रीत पक्ष झाला अशी प्रतिमा निर्माण झाल्याचे देखील त्यांनी मान्य केले. तसेच, पदवीधर निवडणुकीच्या हद्दीपर्यंत ‘सोशल इंजिनिअरींग’ मध्ये काही चुका झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचविल्याचे ते म्हणाले.