मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र ‘विजयदुर्ग’च्या डागडुजीचे काम लवकरच सुरू होणार : छत्रपती संभाजी महाराज
कोल्हापूर । प्रतिनिधी
मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन: बांधणी करून घेतलला विजयदुर्ग किल्ला सध्या अस्तित्त्वासाठी झगडत आहे. मात्र, किल्ल्याच्या डागडुजीसाठी आवशक परवानग्या दिल्लीतून घेतल्या आहेत. लवकरच किल्ल्याच्या डागडुजीचे काम सुरू होईल, अशी ग्वाही युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, प्रत्येक ठिकाणचे एक वेगळेच महात्म्य आणि सौंदर्य असते, तसे विजयदुर्गचेसुद्धा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेल्या अनेक वास्तू आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यांचे जनत, संवर्धन करणं गरजेचं आहे. विजयदुर्ग किल्ला शासनाने रायगड विकास प्राधिकरणच्या अंतर्गत दिला, तर जवळपासून ८० टक्के किल्ला पुन:बांधणी करुन घेता येईल. पुन: बांधणी हा शब्द मी जाणीवपूर्वक घेतला, कारण असा एकमेव समुद्री किल्ला आहे. ज्याच्या जुन्या पद्धतीच्या बांधकाम शैलीतील इमारती बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत. त्यावर तज्ज्ञांची थोडी जरी मदत केली, तरी आपण खूप मोठं कार्य करु शकतो. आम्हाला रायगडावर काम करीत असताना पुनबांधणी करण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत. कारण, इतिहासकालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत.
केवळ भाषण करुन संवर्धन होणार नाही…
महाराष्ट्रातील सरकार असो की केंद्र सरकार असो, केवळ मुंबई-दिल्लीत वातानुकूलीत कार्यालयांत बसून, कधीतरी पत्र लिहून, भाषण करुन किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही. त्याकरिता किल्ल्यावर प्रत्यक्ष जावून बारकाईने अभ्यास करूनच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला बघण्यासाठी जपून ठेवला पाहिजे, असेही युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटले आहे.