मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीसांशीही चर्चा करणार – अशोक चव्हाण
मुंबई – “मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. सकल मराठा समाजाला सर्व पक्षाचे समर्थन आहे, त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारहून आल्यावर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,’ अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात पुढे काय करायचे याची दिशा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारमधून मुंबईत आल्यानंतरच ठरवली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितली. काल (१३ सप्टेंबर) यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारला गेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ तारखेला ते मुंबईत येणार आहेत. त्यानंतर फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे चव्हाणांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका होती आणि आहे, असे चव्हाण यांनी म्हटले.