मराठवाडा वगळता राज्यात दमदार पाऊस
पुणे : काही दिवस दडी मारल्यानंतर पावसाचे राज्यात जोरदार पुनरागमन झालंय. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिक सुखावले आहेत.
राज्यातील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काल दिवसभर पावसाचा जोर कायम होता. येत्या 24 तासांतही मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरूच आहे. पालघरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीवरील धामणी धरणाचे ५ दरवाजे १ फुटांनी उघडण्यात आलेत. त्यातून ३५०० क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने दमदार कमबॅक केलाय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पिकांनाही जीवनदान मिळालंय. नाशिकमध्ये काल संध्याकाळनंतर पुन्हा पावसाने जोर धरलाय. नाशिकमध्ये काल दिवसभर 246 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात पडलाय. नाशिकच्या गंगापूर धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दमदार पावसामुळे गंगापूर धरण 72 टक्के भरलं आहे. तर जायकवाडी धरणही 18 टक्के भरल्याची माहिती मिळते आहे. नाशिक आणि चोपड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाड्यातल्या काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.