मनसेनं चाकरमान्यांना दिलेला शब्द पाळला; गणपती स्पेशल बस सेवा आजपासून केली सुरू
कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकार कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत बससेवा सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. त्याप्रमाणे मनसेनं आपला शब्द पाळला आहे. चाकरमान्यांसाठी मनसेची गणपती स्पेशल बस सेवा आजपासून सुरू झाली आहे.
कोरोनाचे संकट आणि त्याबाबतच्या नियमावलीमुळं यंदा गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी कोंडी झाली होती. विशेषत: रेल्वे व एसटी बस सेवा बंद असल्यामुळं कोकणातील चाकरमान्यांना गावी पोहोचणे कठीण झाले होते. राज्य सरकारही याबाबत तातडीने काही निर्णय घेत नसल्यानं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बुकिंगची तारीखही जाहीर केली होती. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं. त्यानुसार आज बस सोडण्यात आल्या.
मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गाडीत प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मनसेच्या वतीनं प्रवाशांना सेफ्टी किटही देण्यात आलं आहे. यात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर व बेडशीटचा समावेश आहे.
‘राज्य सरकारनं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपली जबाबदारी पार न पाडल्यानं मनसेनं पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांतून अशा बसेस सोडण्यात येतील’, असं त्यांनी सांगितलं. ‘बसच्या एकूण क्षमतेच्या अर्धे प्रवासी जाऊ शकणार आहेत. चिपळूण, महाड आणि सिंधुदुर्गातील कणकवली, सावंतवाडीसाठी या बस सोडल्या जातील. सुमारे अडीचशे बसेसपैकी आज १० ते १५ बसेस सुटतील, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.