भारत राठोड यांच्या बदलीविरोधात उदगीरकर रस्त्यावर, पालिकेसमोर धरणे आंदोलन (व्हिडिओ)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उदगीर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांची राजकीय द्वेषापोटी अचानकपणे बदली झाल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक व उदगीरकर जनतेने बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नगरपालीके समोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुख्याधिकारी भारत राठोड हे गेल्या सहा महिन्यापूर्वीच उदगीर नगरपालिकेला रुजू झाले आहेत. ते रूजु झाल्यापासून त्यांनी उदगीर शहरात विकासाचा कायापालट सुरू केला. विकासाची कामे करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची अचानकपणे बदली झाली. त्यामुळे ही बदली तात्काळ रद्द करावी. या मागणीसाठी सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, एमआयएमच्या नगरसेवकांनी व उदगीरच्या नागरिकांनी नगरपालिकेसमोर साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन ही बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर काँग्रेसचे गटनेते मंजूरखा पठाण, एमआयएमचे गटनेते शमशोद्दीन जरगर यांच्यासह नगरसेवक मेहबूब शेख मनकर्णा मुधाळे, सय्यद हाश्मी, मिर्झा रेश्मा, फय्याज शेख, खाजा याहीया पटेल, नूर जहान पटेल, मीनाक्षी कांबळे, नागेश आस्टुरे यांची नावे आहेत.
कालच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला. अचानकपणे मुख्याधिकाऱ्यांची झालेली बदली हे नेमकं काय घडलं? कशामुळे घडलं? बदली कशामुळे करण्यात आली? याची जोरदार चर्चा शहरात सुरू असून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी उदगीरची जनता उभी राहत असल्याचे दिसून येते.