भारत चीनला आणखी एक दणका देणार, 40 हजार कोटींचा बसणार फटका
नवी दिल्ली: भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक निर्णय घेत चीनला आपला कडक विरोध दाखवून दिलेला आहे. चीन विरोधात भारतीय व्यापारी सर्वात मोठ निर्णय घेण्याच्या तयारीत असून येणाऱ्या सणा-सुदींच्या दिवसांना चिनी माल आयात करणार नसल्याचं The Confederation of All India Traders म्हणजेच CAIT ने म्हटलेलं आहे. CAIT ‘भारताचं सामान-आमचा अभिमान’ हे अभियान राबविणार असून त्यामुळे चीनला तब्बल 40 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यांपासून भारतात विविध सणांना सुरुवात होते. रक्षाबंधन, गौरी-गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठांमध्ये सगळ्यात जास्त खरेदी होते. गेल्या काही वर्षांमध्ये स्वस्त आणि आकर्षक असलेल्या चिनी मालांनी भारतीय बाजारपेठा काबीज केलेल्या होत्या. भारतीय व्यापारी हे चीनमधून हा माल आणत असल्याने भारतीय मालाला उठाव देखील नव्हता. आता सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र सरकाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे चीनला दणका बसलेला आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलेला आहे. त्यामुळे लोकांमध्येही चीन विरोधात भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता भारतीय उत्पादकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
सगळ्या सणांना आता भारतीय मालच वापरण्यात येणार आहे. ग्राहकही आता भारतीय मालाचा आग्रच धरत असल्याने व्यापारीही आता चिनी वस्तूंपासून दूर जात आहे. त्यातच सरकारही भारतीय उत्पादकांना सवलती देण्यासाठी अनेक उपाय योजना करत आहेत. त्यामुळे चीनमधून होणारी निर्यात कमी करण्यात येणार आहे. त्याचा फटका चिनी व्यापाऱ्यांना होणार असून 40 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.