भारत-उत्तर कोरियाची वाढती जवळीक आणि चीन
बीजिंग (चीन) – भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही के सिंग यांनी नुकताच उत्तर कोरियाचा दौरा केला. त्यावरून स्पष्ट होणाऱ्या भारत-उत्तर कोरिया वाढत्या जवळीकीची चीनने गंभीर दखल घेतली आहे. उत्तर कोरियाबरोबरचे संबध अधिक जवळिकीचे करून”ऍक्ट ईस्ट’या आपल्या धोरणाचा पाठपुरावा करत त्याचा विस्तार करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे या संदर्भात ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्र्राने आपल्या संपादकीयात म्हटले आहे.
या धोरणाबाबत भारतावर अमेरिकेचा दबाव येऊ शकेल, परंतु कोणत्याही बाबतीत भारताने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकण्याचे धोरण कायम ठेवले आहे. उत्तर कोरियामधील दूतावास बंद करण्याबाबत अमेरिकेने भारतावर दबाव टाकण्याच प्रयत्न केला होता, परंतु तेव्हाही भारताने अमेरिकेची मागणी ठोकरली होती. अशी टिप्पणी ग्लोबल टाईम्सने केली आहे.
परराष्ट्र राज्य मंत्री व्ही के सिंग हे उत्तर कोरियाच्या आमंत्रणावरूनच तेथे गेले होते. मात्र अलीकडच्या काळात भारताकडून अशा प्रकारचा उच्च स्तरीय दौरा झालेला नसल्याने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांसाठी हा दौरा धक्कादायक होता. मात्र दिल्लीच्या या कृतीकडे विवेकपूर्ण राजनैतिक पाऊल या दृष्टीने पाहिले पाहिजे असे असे संपादकीयात म्हटले आहे.
व्ही के सिंग यांच्या उत्तर कोरिया दौऱ्यामागे पाकिस्तान हे देखील एक कारण आहे. 1999 नंतर उत्तर कोरियाने पाकिस्तनला बॅलेस्टिक मिसाईल टेक्निक पुरवले होते. ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहचू शकेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही, असे आश्वासन भारतानेया दौऱ्यात उत्तर कोरियाकडून घेतले असेल.