breaking-newsक्रिडा

भारतीय महिलांसमोर इंडोनेशियाचे खडतर आव्हान

एएफसी ऑलिम्पिक पात्रता फेरी

एएफसी ऑलिम्पिक पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात होत असून भारतीय महिला फुटबॉल संघासमोर इंडोनेशियाचे आव्हान असेल. इंडोनेशियाविरुद्धची लढत म्हणजे आमच्या मानसिकतेची परीक्षाच असेल, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक मायमोल रॉकी यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘मानसिकदृष्टय़ा आमची कसोटी लागणार आहे. या सामन्यात आम्हाला मानसिकपणे कणखर तसेच आक्रमक खेळ करावा लागणार आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात विजय मिळवण्याचे प्रत्येक संघाचे ध्येय असेल. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यास, आम्हाला पात्र होण्याची चांगली संधी मिळेल. त्यामुळे पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे,’’ असे रॉकी यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात भारताला रोमानिया, उझबेकिस्तान, इराण, हाँगकाँग, कझाकस्तान या प्रतिस्पध्र्याचा सामना करावा लागणार आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी म्यानमारला रवाना होण्यापूर्वी भारतीय महिला संघ १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याचबरोबर इंडोनेशियाविरुद्ध झालेल्या दोन्ही सराव सामन्यात भारताने विजय मिळवले आहेत. ‘‘जानेवारी महिन्यात आम्ही इंडोनेशियाविरुद्ध दोन सराव सामने खेळलो. त्याच वेळी तो खडतर प्रतिस्पर्धी आहे, याची जाणीव आम्हाला झाली. त्यांच्याविरुद्ध दोन्ही सामने जिंकलो असलो तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही,’’ असेही रॉकी म्हणाले.

भारतीय संघ पुढील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे कर्णधार आशालता देवी हिने स्पष्ट केले. ती म्हणाली, ‘‘तिसऱ्या फेरीत खेळण्याचे उद्दिष्ट आम्ही बाळगले आहे. सराव सामन्यातून आम्हाला जो काही अनुभव मिळाला आहे, त्याने आम्ही आनंदी आहोत. म्यानमारमध्ये आम्ही चांगल्या दर्जाच्या कामगिरीचे प्रदर्शन करू.’’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button