भारतातील शेतीसाठी पाण्याचा अतिवापर : नासा
न्यूयॉर्क : उत्तर भारतामध्ये गहू व तांदळाच्या पिकासाठी पाण्याचा अतिवापर केला जातो. त्यामुळे त्या भागातील जलसाठ्यांच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे, असा निष्कर्ष नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने काढला आहे.
भारतासोबतच अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही भागांत पाण्याचे उपलब्ध प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे, अशीही चिंता नासाने व्यक्त केली आहे. या संदर्भातील एक लेख ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याबद्दल निर्माण झालेल्या परिस्थितीचा नासाने उपग्रहांद्वारे पहिल्यांदाच अभ्यास केला आहे. त्यातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जागतिक पातळीवर जलसाठ्यांच्या बदलत्या प्रमाणाला अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यांचा अधिक सखोल अभ्यास करावा लागेल, असे मत नासाच्या लॅबॉरेटरीतील शास्त्रज्ञ जय फमिग्लिट्टी व्यक्त केले आहे.