भारतातील आरोग्यसेवेचे बिल गेट्स यांच्याकडून कौतुक
वॉशिंग्टन – भारतातील आरोग्यसेवेबद्दल मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केले आहे. या आरोग्यसेवेमध्ये भारताने मिळवलेल्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर बालकांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्याच्यादृष्टीने पोषण आहार आणि स्वच्छतेच्या क्षेत्रातही कौशल्य मिळवायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भारताचे सार्वजनिक आरोग्य ही “संमिश्र कथा’ असल्याचे सांगून गेट्स यांनी भारतातील आरोग्य सेवेला बाल आरोग्याशी संबंधित काही क्षेत्रात आणखीही बराच मोठा पल्ला पार करायचा असल्याचे सांगितले.
बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फौंडेशनच्या “सायंटिफिक ऍडव्हायजरी बोर्ड’मध्ये अन्य देशांपेक्षा भारतातील सदस्यांची संख्या जास्त आहे. हे सर्वजण मदतीस तत्पर असतात. अन्यत्र बनवल्या जाणाऱ्या औषधांपेक्षा भारतात जास्त औषधे बनवली जातात. आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्वाधिक निधी भारतातच खर्च केला जातो, असेही गेट्स यांनी सांगितले.
आरोग्यसेवेशी संबंधित बहुतेक गोष्टींमध्ये सुधारणा झाल्या आहेत. खूप वाईट अवस्था असलेली एकही बाब आपल्याला स्मरत नाही. मात्र पोषण आहार आणि स्वच्छतेबाबत अद्याप प्रगती आवश्यक आहे. भारतातील लोक हुशार आहेत. भारतातील लोकशाही सजीव आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसारख्या लोकांना आपण फार पूर्वीपासून ओळखतो. मायक्रोसॉफ्टमुळे भारतातील गुणवत्तेची आणि क्षमतेची ओळख झाली. म्हणूनच आपल्याला भारतात जायला आवडते, असेही गेट्स म्हणाले.