‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइकसारखी हिंमत पुन्हा केली तर त्याच्या दहा पट ताकदीने त्यांना उत्तर दिले जाईल, अशी धमकी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे. ते लंडन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पाकिस्तानी लष्कराला देशात लोकशाही मजबूत करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
चीन-पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाबत (सीपेक) बोलताना आसिफ गफूर म्हणाले की, या योजनेमुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या योजनेला सुरक्षा पुरवणे ही सशस्त्र दलाची जबाबदारी आहे. आजचा पाकिस्तान हा कालच्या पाकिस्तानपेक्षा चांगला असून भविष्यात आम्ही आणखी मजबूत होऊ.
राष्ट्रीय एकतेपेक्षा उत्कृष्ट काहीच नाही, असे सांगत त्यांनी निवडणुका प्रभावित करण्याचा पाक लष्करावरील आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केले. यासंबंधी कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणले पाहिजे. पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या इच्छेनुसार मतदान केले आहे.