भारताचे विद्युतीकरणाचे काम अत्यंत संतोषजनक
जागतिक बॅंकेंचे निरीक्षण
वॉशिंग्टन – भारताने गेल्या काही वर्षांत देशाच्या विद्युतीकरणाच्या कामात अत्यंत समाधानकारक प्रगती केली असून सन 2010 ते 2016 या अवधीत भारताने दरवर्षी तीन कोटी लोकांपर्यंत वीज पोहचवली आहे. हे जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक वेगाने करण्यात आलेले काम आहे असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
भारताने आज आपल्या लोकसंख्येच्या 85 टक्के लोकांपर्यंत वीज पोहचवली असली तरी अजून उर्वरीत 15 टक्के लोकांपर्यंत वीज पोहचवण्याचे काम अद्याप बाकी आहे. तथापी सन 2030 पर्यंत भारतातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे असे जागतिक बॅंकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या विद्युतीकरणाचा वेग चांगला असला तरी तो सर्वाधिक आहे असे मात्र म्हणता येत नाही. भारतापेक्षा बांगलादेश आणि केनिया या सारख्या राज्यांनी अधिक वेगाने विद्युतीकरण पुर्ण केले आहे. तथापी आता भारतही विद्युतीकरणाच्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे ही समाधानाची बाब आहे असे जागतिक बॅंकेच्या एनर्जी इकॉनॉमिस्ट विविएन फोस्टर यांनी म्हटले आहे. केवळ एखाद्या गावात वीज पोहचून पुरेशी नाहीं तर तेथील प्रत्येक घरात वीज पोहचणे महत्वाचे आहे त्यासाठी भारताने आता अधिक प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.