भारताकडून रोबोटिक शस्त्रांच्या विकासावर काम सुरू
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एका महत्त्वाकांक्षी संरक्षण प्रकल्पांतर्गत सुरक्षा दलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर काम सुरू केले आहे. प्रकल्पाचा उद्देश सुरक्षा दलांना मानवरहित रणगाडा, नौका, हवाईयान आणि रोबोटिक शस्त्रांनी सज्ज करत मोहिमात्मक तयारींना महत्त्वपूर्ण पद्धतीने पुढे नेणे आहे.
चीन स्वतःच्या सैन्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या व्यापक व्यापारासाठी मोठय़ा वेगाने गुंतवणूक वाढवत आहे. अशा स्थितीत भारताचे सैन्य, वायूदल आणि नौदलाला भविष्यातील युद्धासाठी तयार करण्याच्या व्यापक धोरणात्मक पुढाकारावर काम केले जातेय.
सरकारने सुरक्षा दलांच्या तिन्ही शाखांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील युद्धाची गरज पाहता हे एक ‘महत्त्वाचे क्षेत्र’ ठरणार आहे. टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखालील एक उच्चस्तरीय कार्यदल प्रकल्पाच्या आराखडय़ाला अंतिम रुप देत असल्याची माहिती संरक्षण सचिव (उत्पादन) अजय कुमार यांनी दिली.
सशस्त्र दल आणि खासगी क्षेत्राच्या ‘भागीदारी प्रारुपा’तंर्गत प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. पुढील पिढीच्या युद्धासाठी भारताची तयारी सुरू आहे. भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचेच असून पुढील पिढीच्या युद्धासाठी स्वतःला सज्ज करण्याची गरज आहे. अन्य महाशक्तींप्रमाणेच भारताने देखील स्वतःच्या सशस्त्र दलांची क्षमता बळकट करण्याच्या हेतूने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर काम सुरू केले आहे.