भाज्यांच्या दरांना महागाईची फोडणी
नवी मुंबई : तापमानात वाढ झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा दृश्य परिणाम बाजारपेठेत दिसू लागला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांना महागाईची फोडणी बसली आहे. अगदी वीस रुपये किलोच्या घरात असलेली भाजी सध्या ४० ते ५० रुपये किलोच्या घरात गेली आहे. घाऊक बाजारातच दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात ही दरवाढ अधिक तीव्र झाली आहे.
उन्हाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली. उत्पादन आणि आवक घटल्याचा हा परिणाम आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई असल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भेंडी १५ ते २० रुपये किलोवरून २० ते २४ रुपये किलो, फरसबी २० ते ३० रुपये किलोवरून ६० ते ७० रुपये किलो, फ्लॉवर ८ ते १० रुपये किलोवरून १५ ते १८ रुपये किलो झाला आहे. गवार २५ ते ३० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपये किलो, घेवडा १८ ते २० रुपये किलोवरून ३६ ते ४० रुपये किलो, १८ ते २० रुपये किलो असणारी दोडकी ३२ ते ३४ रुपये किलो झाली आहेत.