भाजप-राष्ट्रवादीच्या श्रेयवादाच्या राजकारणात गोरगरिबांच्या स्वप्नांवर ‘सक्रांत’
- राजशिष्टाचार शिकविणा-या भाजपकडूनच शिष्टाचाराला हरताळ
- अजित पवारांना निमंत्रण न दिल्याने पदाधिका-यांचा थयथयाट
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवडमध्ये हक्काचा निवारा करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतील छोटेसे घर मिळावे, या आपेक्षेपोटी शहरातील सुमारे पन्नास हजार नागरिकांनी अर्ज केले. त्यातील काही सदनिकांची सोडत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. यादीत आपले नाव येण्याची प्रतिक्षा लागलेल्या 47 हजार 801 एवढ्या पात्र अर्जदारांचे सोडतीकडे लक्ष लागले होते. मात्र, राजशिष्टाचाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चाललेल्या श्रेयवादाच्या राजकारणात हजारो गोरगरिबांच्या स्वप्नांवर सक्रांत आली आहे.
नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पंतप्रधान आवास योजना प्रकल्प राबवून नागरिकांचे अर्ज भरून घेतले. त्याच्या सदनिका सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केले होते. मात्र, पालिकेत सत्ताधारी भाजप असल्याने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले होते. परंतु, 2017 पासून प्रोटोकॉलचे तुणतुणे वाजविणा-या भाजप सत्ताधा-यांनी पालकमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमाचे जाणिवपूर्वक निमंत्रण दिले नाही. यामध्ये राष्ट्रवादीचा ‘इगो हर्ट’ झाल्यामुळे सोडत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांनी चिंचवडच्या मोरे प्रेक्षागृहासमोर नारेबाजी करत भाजपचे वाभाडे काढले. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवालयातून आयुक्तांवर दबाव आल्याने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
कार्यक्रम रद्द केल्याचे खापर आयुक्तांवर फोडत भाजपच्या कथीत निष्ठावंतांनी पालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. कधीकाळी आयुक्तांचे गोडवे गाणा-या पदाधिका-यांनी पक्षाविषयी कळवळा दाखवत अत्यंत खालच्या पातळीचे आरोप केले. यामध्ये पालिका प्रशासनाची चूक असल्याचे दिसत असले तरी पूर्वनियोजन हे सत्ताधा-यांच्या सूचनेप्रमाणेच केले जाते. त्या सूचनेचा आज भंग झाल्यामुळे लाडके वाटणारे आयुक्त भाजपच्या पदाधिका-यांना चांगलेच झोंबायला लागले आहेत. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीच्या श्रेयवादाच्या राजकारणात सोडत रद्द करून हजारो गरिबांना पुन्हा प्रतिक्षेत ठेवले आहे.
गरिबांच्या स्वप्नांचा चक्काचूर
पिंपरी-चिंचवड शहरातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी एकूण 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले. त्यामुळे च-होली एक हजार 442, रावेत 934, बो-हाडेवाडी एक हजार 288 अशा एकूण 3 हजार 664 घरांसाठी सोडत काढण्याचा नियोजित कार्यक्रम होता. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार होती. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील खाणेरड्या राजकारणामुळे गरिबांच्या हक्काचे घराचे स्वप्न भंगले आहे.