भाजप पदाधिका-यांची आश्वासने म्हणजे “बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी”
- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची टिका
- शास्ती कर माफीचे आश्वासन गजर असल्याचा आरोप
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील नागरीकांना शास्तीकर माफीचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे भाजपचे पदाधिकारी यांनी जाहीर केले. आत्तापर्यंत भाजपाने नागरिकांना आश्वासनांची नुसती गाजरे दाखवली आहेत. प्रत्यक्षात नागरीकांच्या हाती काहीच पडले नाही. भाजप पदाधिका-यांची आश्वासने म्हणजे “बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी” असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते साने यांनी प्रसिध्द पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील ६०० चौरस फूट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराच्या बांधकामांना ५० टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळी नंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर १५ दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. नागरीकांना दिवाळीनंतर प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे.
वस्तुत: शहरातील नागरीकांची जाचक असलेल्या शास्ती करापासून सुटका होण्यासाठी संपूर्ण शास्तीकर माफ होणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीपासून आग्रही आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महापालिकेत ठराव देखील केला आहे. परंतु सत्ताबदलामुळे या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्यक्षात शासन निर्णयामध्ये प्रत्येक महापालिकेने शास्तीकराबाबत स्वत: निर्णय घ्यावा, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, भाजपच्या पदाधिका-यांमुळे शास्तीकराचा राक्षस नागरीकांच्या मानगुटीवर अजूनही बसलेला आहे. तसेच, शास्तीकर सवलतीचा लाभ ५० हजार कुटूंबाना मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, प्रत्यक्ष ६०० चौरस फूट व ६०१ ते १ हजार चौरस फूट आकाराच्या निवासी बांधकामाची संख्या २५ हजारपेक्षा जास्त नाही. म्हणजेच, या शास्तीकराचा फायदा शहरातील २ टक्के नागरीकांनाही झालेला नाही. भाजपाचे सरकार आश्वासनांची नुसती गाजरे दाखवित आहेत. प्रत्यक्षात नागरीकांच्या हाती काहीच पडत नाही. भाजप सरकारच्या पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांना आता कळून चुकले आहे की, भाजपाचा नुसता बोलाचाच भात बोलाचीच कढी असल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे.