भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज- चंद्रकांत पाटील
मुंबई : भाजप आणि शिवसेनेने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अन्यथा याचा फायदा काँग्रेसला होईल. काँग्रेसची सत्ता कशी असते याचा कटू अनुभव लोकांनी घेतला आहे. ही वेळ पुन्हा येऊ नये, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पालघर लोकसभा निवडणुकीवरून भाजपा शिवसेनेमधील वादाला नव्याने फोडणी मिळालेली आहे. याविषयी महसूलमंत्री पाटील म्हणाले, दिवंगत चिंतामण वणगा यांच्या कुटुंबातून एकाला उमेदवारी देण्याचे भाजपाने निश्चित केले होते. पण याबाबतची कसलीच खातरजमा न करता उद्धव ठाकरे यांनी वणगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वणगा यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेची ही कार्यशैली पालघरमधील वादाला कारणीभूत ठरली आहे.