भाजपबरोबरची अपवित्र युती तोडा…
- चिदंबरम यांची मेहबुबा मुफ्ती यांना सुचना
नवी दिल्ली – भाजपबरोबरच्या युतीमुळेच काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली असल्याने मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप बरोबरची युती तोडून टाकावी अशी सूचना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की लष्कराचा आणि बळाचा वापर करण्याच्या केंद्र सरकारच्या मानसिकतेमुळेच काश्मीरातील स्थिती बिघडली आहे. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपशी युती तोडून आपल्या वडिलांच्या विचारधारेनुसार काम करावे आणि पुन्हा जनतेपुढे जावे असे आवाहनही चिदंबरम यांनी ट्विटर संदेशाद्वारे त्यांना केले आहे.
राज्यात सुरू असलेले हत्यासत्र थांबवण्यासाठी राजकीय चाणाक्षपणाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रयत्न होताना दिसत नाहीत अशी खंत अलिकडेच मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली होती. पण त्यांनी भाजपबरोबर केलेली युती हाच खऱ्या समस्येचा गाभा आहे तो त्यांनी लक्षातच घेतलेला दिसत नाही अशी टिपण्णीही चिदंबरम यांनी केली आहे.