भाजपच्या राजकारणातील प्यादे बनल्याची काश्मिरींची भावना
यशवंत सिन्हा यांच्या गटाचा अहवाल
श्रीनगर, भाजपच्या राजकारणातील प्यादे बनल्याची काश्मिरींची भावना आहे. मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या भाजपच्या निर्णयामागे काश्मीर खोऱ्यातील स्थितीचा फारसा संबंध नाही. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन तो निर्णय घेण्यात आला, असे बहुतांश काश्मिरींना वाटत आहे.
कन्सर्न्ड सिटीझन्स ग्रुपच्या (सीसीजी) अहवालात काश्मिरींची ही भावना नमूद करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली हा गट कार्यरत आहे. जम्मू-काश्मीरमधील विविध घटकांशी अनौपचारिक चर्चा करून सीसीजीने हा अहवाल तयार केला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मांडण्यासारखी फारशी कामगिरी मोदी सरकारकडे नाही. त्यामुळे काश्मीरचा वापर करून देशातील आणि राज्यातील मतदारांचे जातीय ध्रुवीकरण करण्याची रणनीती असावी, असे काश्मिरींना वाटत आहे. पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयामुळे मेहबुबा आणि त्यांचा पीडीपीही चकित झाला असावा. पुढे काय होऊ घातलेय याची जाणीव असती; तर कदाचित राजकीय लाभ उठवण्यासाठी मेहबुबाच आघाडी सरकारमधून बाहेर पडल्या असत्या, असेही अनेक काश्मिरींनी बोलून दाखवल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे.
काश्मीर मुद्द्यावर काही करण्याची केंद्र सरकारची इच्छा दिसत नाही, असाच संदेश काश्मिरी जनतेमध्ये गेलेला दिसतो. ही स्थिती पुढील वर्षी केंद्रातील सरकार बदलले तरी भारतीय लोकशाहीसाठी आव्हानात्मक ठरू शकते, असा इशाराही अहवालातून देण्यात आला आहे.