भाजपचे वर्तन ‘कोरोना व्हायरस’पेक्षा भयंकर, अशोक चव्हाणांचा हल्ला
मुंबई | महाईन्यूज
राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ला खतपाणी घातलं जाणार नाही. भाजपचं वर्तन ‘कोरोना व्हायरस’पेक्षाही भयंकर आहे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली.
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उलथवून लावण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांचे आठ आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर टिका केली. ते म्हणाले की, मला वाटतं ‘ऑपरेशन लोटस’ आता नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हा सर्वांना याची सवय झालेली आहे. जे-जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत. ते कधीही ‘ऑपरेशन लोटस’ला यशस्वी होऊ देणार नाहीत. देशात लोकशाही मार्गानेच सरकार चालली पाहिजेत, मग ती कोणाचीही असू देत, असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.
कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवला. ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा भाजप म्हणजे कोरोना व्हायरसपेक्षा कठीण वर्तन करत आहे. त्यामुळे दक्षता घेतली पाहिजे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.