भाऊबीजेच्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना अखेरचा निरोप
कोल्हापूर – एकीकडे देश दिवाळीचा जल्लोष करत असताना दुसरीकडे भारताच्या सीमेवर महाराष्ट्रातील दोन पुत्रांना वीरमरण आलं आहे. आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी गावातील जनसागर लोटला होता. साश्रू नयनांनी त्यांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आला.
पाकिस्तानने शुक्रवारी केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा 20 वर्षीय जवान ऋषीकेश जोंधळे आणि नागपूरचा 28 वर्षीय वीर भूषण सतई हे धारातीर्थी पडले.आज भाऊबीजेच्या सणादिवशी जड अंतरकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाकिस्तान सैन्याकडून शुक्रवारी पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचे उल्लंघन केले जात होते. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला. पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्यात नेत असताना त्यांचे निधन झाले.
जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आज 4 दिवसांनी त्यांचे पार्थिव गावी दाखल झाले आहे. ‘भारत माता की जय’ आणि ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. दुःखद बाब म्हणजे आज भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश जोंधळे यांची बहिण कल्याणी यांनी अखेरचे ओवाळले.