बोगस ‘एफडीआर’ घोटाळ्यातील ठेकेदाराने अर्धवट रस्ता करुन ढापले पाच कोटी?
- सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांचा आरोप
- महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे चाैकशीची मागणी
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १२ मधील त्रिवेणीनगर ते तळवडे रस्ते विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून करदात्या नागरिकांचे पैसे दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, सदरील ठेकेदार बोगस एफडीआर प्रकरणात दोषी आढळला असून त्यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केली आहे.
यासंदर्भात सतीश कदम यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महानगरपालिकेच्या “फ” क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १२ मध्ये त्रिवेणीनगर ते तळवडे या ३.२ किलोमीटर आणि २४ मीटर रुंदीच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्याधी पदपथ दुरूस्ती, पाणीपुरवठा पाइपलाईन, विद्युतपुरवठा, स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेजसारखी भूमिगत कामे केली जाणार आहेत. हे काम ४ कोटी ९८ लाख रूपयांच्या खर्चाचे आहे. तसेच या रस्त्यांवर जागोजागी दिशादर्शक तसेच नो पार्किंगचे फलक लावले जाणार आहेत. प्रत्यक्षात कामाचा आदेश देऊनही हे काम झालेले नाही. त्यामुळे या कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे हे काम मिळालेल्या मे. राधिका कनस्ट्रक्शन या ठेकेदारकडून दंड वसूल करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. या रस्ते विकासाबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही बोटचेपी भूमिका घेतलेली दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून मुदतीत काम पूर्ण करून करदात्यांचे पैसे वाचविण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. उलट या कामाला विलंब होईल आणि ठेकेदाराला जादा पैसे देऊन त्यातून वाढीव टक्केवारी खाण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या कामाला विलंब करणाऱ्या ठेकेदाराला कायम स्वरूपी काळ्या यादीत टाकावे. तसेच या कामाची जबाबदारी असणाऱ्या स्थापत्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे,
सुमारे पाच कोटी रुपये खर्च करुन झालेल्या त्रिवेणी नगर ते तळवडे या ३.२ मीटर रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना रोड मध्ये प्रचंड त्रुटी असून नियमानुसार रस्त्याची उंचीसुध्दा नाही. तसेच प्रत्यक्षात मोजणी केली असता सदरचा रस्ता ३.२ मीटर पूर्ण झालेले नाही. तसेच गणेशनगर भागातील सुमारे ५०० मीटर रस्ता ताब्यात नसताना देखील ३.२ × २४ मीटर रस्त्याचे रुंदीकरण व फुटपाथ झाले असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. रस्त्याच्या कामांचे संपूर्ण बिल महापालिकेने ठेकेदाराला आदा केले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांची संपत्ती जप्त करुन ‘त्या’ रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे.
या रस्त्यात केवळ त्रिवेणीनगरपासून ते टॉवरलाईन पर्यंतच ६०० मीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे. तळवडे चौकापासून जोतिबानगरपर्यंत ७५० मीटर रस्त्याचे काम प्रत्यक्षात झाले आहे. रस्ते प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधी ऑगस्ट २०२० पर्यंत होता. रस्त्याचे झालेले काम देखील अत्यंत निकृष्ट आहे. रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व भराव तांत्रिकदृष्ट्या योग्य नसून या कामाची गुण नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. या रस्त्यावर नविन फुटपाथ देखील बांधण्यात आले नाही. कोणतेही काम प्रत्यक्षात पूर्ण झाले नसताना स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काम पूर्णत्वाचा दाखल दिलेला आहे. विशेष म्हणजे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या सर्वानी सदर रस्त्याचे काम पूर्ण केल्याचे भासवून ठेकेदाराला बिल देखील दिले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन जनतेचा पैसे लुबाडणार्या अधिकार्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी. दोषींविरोधात कडक कारवाई करावी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून महापालिकेचे पैसे लाटणाऱ्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या कामाची रक्कम संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून वसूल करावी.