बेस्टच्या वीज ग्राहकांना मनसेकडून मोठा दिलासा; आता अर्धेच बिल भरण्याची मुभा
वाढीव वीज बिलामुळं मुंबईकर हे त्रस्त झाले होते.मात्र आता बेस्टच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव वीज बिलातील ५० टक्के रक्कम भरण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. मनसेनं तसा दावा केला आहे.गेल्या दोन महिन्यातील वाढीव वीज बिलामुळं हादरलेल्या मुंबईतील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ‘वाढीव वीज बिलाची अर्धीच रक्कम भरण्याची मुभा बेस्टनं ग्राहकांना दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तसा दावा केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात मीटर वाचन करता न आल्यानं वीज कंपन्यांनी ग्राहकांना आधीच्या तीन महिन्यांच्या वीज बिलांची सरासरी काढून बिले पाठवली होती. अनलॉक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष मीटर वाचन सुरू झाले व ग्राहकांना आधीच्या बिलाच्या फरकासह बिले पाठवण्यात आली. मात्र, अनेक ग्राहकांचा वीज वापर कमी नसतानाही त्यांना अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
मनसेकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन मनसेच्या शिष्टमंडळानं आज बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व वाढीव वीज बिलाचा मुद्दा नजरेस आणून दिला. मनसेकडं आलेल्या तक्रारीची एक प्रतही अधिकाऱ्यांना देण्यात आली. मनसेचा मुद्दा योग्य असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केलं. ज्या ग्राहकांना वाढीव वीज बिल आलं आहे, त्यांना सुधारीत बिल पाठवण्यात येईल. तसं न झाल्यास संबंधित ग्राहकांकडून वीज बिलाची अर्धी रक्कम स्वीकारली जाईल, असं आश्वासन बेस्ट प्रशासनानं मनसेला दिलं. मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बेस्ट प्रशासनानं दिलेल्या या सवलतीची माहिती एका व्हिडिओ ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.