बॅलेटद्वारे झालेले मतदान योग्य; पदवीधर निवडणुकीत सिध्द झाले
आळंदी |महाईन्यूज|
लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत कुठे जातेय हे समजून घेण्याचा अधिकार मतदाराला आहे. आता झालेल्या पदवीधर निवडणूकीच्या माध्यमातून बॅलेटद्वारे झालेले मतदान योग्य आहे. हे पुन्हा सिद्ध झाले. त्यामुळे आता लोकच ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान घ्या, अशी मागणी करु लागल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आळंदीत सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीबाबत आढावा घेण्यासाठी आणि वारकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पटोले आळंदीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक, अॅड विकास ढगे, योगेश देसाई, निलेश लोंढे, संजय घुंडरे, डि.डी.भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, राम गावडे, नंदकुमार वडगावकर, संदिप नाईकरे, गोविंद गोरे, बाळासाहेब रावडे, मुख्याधिकारी अंकूश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे पटोले म्हणाले, ”आम्ही कुणाला मतदान दिले लोकांना समजले पाहिजे. लोकशीहीतील ही व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे देश कृषिप्रधान आहे. २०१७ ला मी राजीनामा दिल्यानंतर शेती आणि कायद्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली.
केंद्र सरकारने सध्या लादत असलेला शेती कायद्यास बहूतांश ठिकाणी विरोध केला जात आहे. विरोधी पक्षाने विरोध केला तर सत्ताधारी त्याला भूमिकेला राजकिय मानतात. दिल्लीतील कडाक्याची थंडी असूनही लाखो शेतकरी रस्त्यावर बसून आहे. सरकारकडून केवळ बैठकीच्या फेऱ्या सुरू असून आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या. मात्र दिलासादायक निर्णय अद्याप नाही. शेतकऱ्यांसोबत झालेली मागण्याबाबतची चर्चा लिखित रूपात बदल करून प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. अन्नदात्याला थंडीत न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसतो हे देशाच्या कृषीप्रधान संस्कृतिक बसत नसल्याची टिकाही केंद्र सरकारबाबत पटोले यांनी केली.