बीड जिल्ह्यात एसटी बसला अपघात, तीनजण ठार, तर 15 जण जखमी
बीड | महाईन्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला समोरून येणा-या वाहनाची धडक बसल्याने बसमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले तर 15 जण जखमी झाले आहेत. केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव येथे मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मृत असलेले तिघेजण लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यतील रहिवासी आहेत.
शाम राजगिरवाडी (वय ३७ रा. जळकोट जि. लातूर), विजया बाळासाहेब देशमुख (वय ५५, रा. मुखेड, जि. नांदेड), अनिल मोतीलाल कोळकर (वय ५०, मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील चंदन सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथे मंगळवारी दुपारी औरंगाबादकडून केज मार्गे मुखेडकडे (जि. नांदेड) जाणाऱ्या बसला (एमएच २० – बीएल ३७२१) अंबाजोगाईकडून भरधाव वेगात येणाऱ्या मालमोटारीने जोराची धडक दिली. मालमोटारीला पाठीमागील बाजूस कोंबडय़ांची वाहतूक करण्यासाठी लोखंडी जाळी लावलेली होती. या जाळीने बसच्या उजव्या बाजूचा पत्रा कापला. यात खिडकीजवळ बसलेले प्रवासी अपघात जखमी झाले.
बस आणि मालमोटार समोरासमोर आल्यानंतर काही क्षणात बसचा अर्धा भाग पुढे गेल्यानंतर लोखंडी जाळीने बाजूच्या खिडक्या कापल्या. त्यामुळे प्रवाशांच्या चेहऱ्यांनाच जास्तीचा मार लागला. भरधाव वेगातील बस एकदम थांबल्याने इतर प्रवासीही मोठय़ा प्रमाणात जखमी झाले तर मालमोटार रस्त्यावर आडवी झाली.